शनिवार, ६ एप्रिल, २०१३

नवा क्षण , नवा पवित्रा , नवा अनुभव !



विवेकनिष्ठ भावोपचार -
  नवा क्षण , नवा पवित्रा , नवा अनुभव !

 आजवर जीवनात आलेल्या विविध व्यक्ती आणि अनुभवांच्या आधारे जीवनविषयक आणि संपर्कातील व्यक्तींविषयी.... घटना ..परिस्थिती या बद्दल एक दृष्टीकोन प्रत्येकाने मनात तयार करून ठेवला असतो , हा दृष्टीकोन सहजासहजी बदलणे शक्य होत नाही आणि मग त्यामुळे जाती , धर्म , व्यक्ती , प्रसंग , या बाबत प्रतिक्रिया देताना किवा कोणत्याही व्यक्ती अथवा प्रसंगाना सामोरे जाताना हा दृष्टीकोनच आपल्या वागण्या बोलण्याची दिशा ठरवतो . अनेकदा हा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित असतो मात्र आपला आपल्या दृष्टीकोनावर ठाम विश्वास असतो आणि माझा विचार अगदी योग्य आहे .. माझा तसा अनुभव आहे .. अशी समर्थने या दृष्टीकोना मागे आपण देत असतो ...अशा वेळी इतरांचे देखील काही आडाखे ..अंदाज .. दृष्टीकोन असतात . प्रत्येक क्षणी जर आपण व्यक्ती , प्रसंग यांना सामोरे जाताना मनाची पाटी कोरी ठेऊन कोणताही चांगला -वाईट दृष्टीकोन न ठेवता वावरता आले तर किती बरे होईल ? अनेक गोष्टी आपल्याला नव्याने समजतील , नवीन अनुभव देतील आणि नवी शिकवण देखील मिळेल . पण अर्थात आपण शिकण्याच्या भूमिकेत असलो तरच .पूर्वी जेव्हा मी नियमित बसने प्रवास करत होतो तेव्हा बसमधील एका कंडक्टर सोबत सुटे पैसे , व इतर बाबतीत माझा एक दोन वेळा वाद झाला होता आणि हे कंडक्टर असलेच तिरसट असतात , सुटे पैसे मुद्दाम देत नाहीत , पैसे मारतात वैगरे नकारात्मक भाव असलेला दृष्टीकोन माझ्या मनात तयार झाला होता , त्यामुळे त्या बस मध्ये मी नेहमी कडवट मनानेच प्रवास करत असे एकदा बस मध्ये कमी गर्दी असताना मी सहज तो कंडक्टर निवांत असलेला पाहून त्याच्याशी मुद्दाम बोलणे सुरु केले त्याच्या ड्युटी बद्दल , कुटुंबाबद्दल माहिती विचारली , सुरवातीला तो जरा मोजकेच बोलला , कदाचित त्याचा ही माझ्या बद्दल हा माणूस जरा अतिशहाणा आहे , आगावू आहे वैगरे दृष्टीकोन असावा मात्र मी नेटाने बोलत राहिलो तेव्हा तो भरभरून बोलू लागला व त्याने त्याच्या नोकरीतील अडचणी , कटकटी , वरिष्ठांची दादागिरी , व इतर घरगुती समस्या एखाद्या मित्राप्रमाणे सांगितल्या . त्यानंतर माझा त्या कंडक्टर शी कधीच वाद झाला नाही . आपल्याला आवडत नसलेल्या , मनात राग असलेल्या , ज्याच्याशी अजिबात पटत नाही , अशा व्यक्तीशी जरा वेगळ्या, नव्या पद्धतीने बोलून पहा मग नक्की लक्ष्यात येईल की थोडा स्नेहाचा , मैत्रीचा , सहानुभूतीचा ओलावा मिळाला की माणसे वेगळी वागतात व मग जग सुंदर आहे हे नव्याने जाणवते . अर्थात आपण चिकाटी सोडता काम नये !



ऐकले ते पटले , वाचले ते मनात ठसले ! विवेकनिष्ठ भावोपचार 

एखाद्या व्यक्तीकडे , घटनेकडे अथवा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन तयार होण्यास प्रामुख्याने जवाबदार असलेल्या घटकांमध्ये ऐकीव अथवा वाचलेल्या माहितीचा देखील मोठा सहभाग असतो . अनेकदा ही वाचलेली अथवा ऐकलेली माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा करण्याचे कोणतेही परिणामकारक साधन उपलब्ध नसते तरीही आपण या माहितीवर आधारित असा आपला विशिष्ट दृष्टीकोन तयार करत असतो . यासाठी एक प्रयोग आपणास करता येईल , एखादी घटना घडतांना तेथे हजर असलेल्या चार प्रत्यक्षदर्शी व्यक्तीना जर आपण वेगवेगळे गाठून त्या घटनेबद्दल नेमके काय घडले ही माहिती विचारली तर प्रत्येक जण जे काही सांगेल त्यात आपणास अतिशयोक्ती , काल्पनिकता , किवा घटनेचा काही भाग विसरल्याने त्रोटकता , कच्चे दुवे आढळतील म्हणजेच मानवी स्वभावानुसार माहिती अधिक रंजक करण्यासाठी काही ठिकाणी तिखट मीठ लावून वर्णनकेले जाईल किवा काही भाग महत्वाचा न वाटल्याने गाळला जाईल. ती घटना घडत असताना पाहणारे जे चार जण असतील त्यांचे देखील विशिष्ट दृष्टीकोन असतात त्या घटनेकडे पाहण्याचे व त्या नुसारच त्या घटनेचे वर्णन केले जाईल . म्हणजेच एकंदरीत जे काही सांगितले जाईल त्यात १०० टक्के सत्य असेलच याची खात्री नसते अनेकदा वर्णन करण्यची पद्धत किवा वर्णन करणाऱ्याचे वाक् चातुर्य ही देखील यात परिणाम साधणारी जमेची बाजू असते . मात्र आपण अनेकदा अश्या ऐकीव माहितीच्या आधारे एखादी व्यक्ती , घटना , परस्थिती आणि जाती धर्माबद्दल आपले दृष्टीकोन बनवत असतो जे अविवेकी असू शकतात .लेखन हे मानवी विचार व भावना प्रकट करण्याचे एक प्रभावी साधन आहे यात दुमत नाही मात्र कोणत्याही विशिष्ट विचाराने अथवा भावनेने प्रेरित न होता तटस्थ पणे लिखाण करणे बहुधा शक्य होत नाही कारण लेखन करताना प्रत्येक लेखक देखील आपला विशिष्ट दृष्टीकोन वाचकांना पटावा अश्या पद्धतीने लिहीत असतो व त्यासाठी तो अनेक खरे खोटे पुरावे किवा दाखले देण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण लेखनामागची प्रेरणा व हेतू देखील साध्य व्हावा अशी त्याची इच्छा असते . सध्या छापील आहे म्हणजे खरेच असणार असा एक सर्व साधारण समज तयार झाला आहे त्यामुळे वर्तमान पत्र , मासिके , नियतकालिके , ऐतिहासिक वैगरे जे काही साहित्य निर्माण झाले आहे किवा होते आहे त्यातील छापलेले सर्व काही खरे असावे असा आपला समज अनेकदा व्यक्ती , प्रसंग , परिस्थिती याबाबतचे अविवेकी दृष्टीकोन तयार करीत असतो . या पूर्वीच्या लेखात प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाच्या , घटनेच्या , अथवा परिस्थितीच्या अनेक वेगवेगळ्या बाजू किवा कंगोरे असतात मात्र बहुधा आपण त्यापैकी एखादी विशिष्ट बाजू अनुभवतो किवा पडताळतो आणि त्याबद्दल आपले मत तयार करतो हे विवेकनिष्ठ नाही हे आपण पहिलेच आहे .तेव्हा ऐकले ते सगळे खरे , वाचले ते देखील सगळे खरे असा अविर्भाव न ठेवता त्याबाबत तटस्थपणे आपले दृष्टीकोन बनवता आले तर अधिक योग्य राहील .

मुलभूत तत्वे !

विवेकनिष्ट भावोपचार ... मुलभूत तत्वे !


विवेकनिष्ठ भावोपचार ही स्वतच्या विचारात ..भावनात ..दृष्टीकोनात  आणि पर्यायाने कृतीत बदल करण्याचे उपचार आहेत .. अल्बर्ट एलीस या मानस शास्त्रज्ञाने ही उपचार पद्धती विकसित केली आहे ..खरे अल्बर्ट एलीसच्या खूप आधी  गीतेत  श्रीकृष्णाने .. महात्मा गौतम बुद्धाने ..नंतर समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचा सखोल अभ्यास करून मनाच्या वेगवेगळ्या अवस्था .. मनाचे विद्रोह .. मनाची चंचलता .. मनाचे कठीण कंगोरे .. याबाबत माहिती दिली आहे .. अश्या मनाला सन्मार्गावर ठेवण्यासाठी उपाय सांगितले आहेत .. अल्बर्ट एलीस यांनी हेच सगळे मानसशास्त्रीय भाषेत सांगून जणू त्याला दुजोराच दिला आहे .
१) सर्वात आधी हे मान्य केले पाहिजे की मला जसा माझ्या इच्छे प्रमाणे सगळे घडावे व मी नेहमी सुखी राहावे असे वाटते तसेच माझ्या आसपासच्या सर्व जीवांना देखील तसेच वाटते त्यामुळे माझे सुख मिळवण्याच्या नादात मी कोणाला दुखः तर देत नाहीय ना ? कोणावर अन्याय तर करीत नाहीय ना या बाबत दक्ष राहणे .
२ ) विवेकनिष्ठ भावोपचार म्हणजे , वेळोवेळी स्वतच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना समजून घेत त्यांचे योग्य विश्लेषण करणे व त्यापैकी स्वतःला वा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या भावना मनातून काढून टाकणे.
३) एखाद्या घटनेच्या , एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाच्या , अथवा एखाद्या प्रसंगाच्या मला न जाणवलेल्या किवा न समजलेल्या अनेक बाजू असतात हे निखळ सत्य आहे तेव्हा या बाबतीत सर्व बाजूंचा विचार करून मग संबधित घटनेबाबत , व्यक्तीबाबत अथवा परिस्थिती बाबत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना तटस्थ पणे पाहून अविवेकी भावना दूर करणे .
४ ) कोणतही व्यक्ती १०० टक्के वाईट अथवा १०० टक्के चांगली नसते, तर माझ्या त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन त्या व्यक्तीला तसे ठरवीत असतो . प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या वाईट गोष्टींचे मिश्रण असते . फारच थोडे लोक जे अध्यात्म समजतात व आचरणात आणतात ते या पलीकडे जातात .
५) माझ्याशी संबधित लोकांनी नेहमी माझ्याशी चांगले वागावे , माझा मान ठेवावा , माझ्याशी गोड बोलावे , असे मला वाटते तसेच इतरांना देखील वाटत असते व त्याकडे मी दुर्लक्ष करता कामा  नये .
६) नेहमी आसपास घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांबाबत कोणतीही प्रतिक्रिया देताना भावनेच्या भरात न देता मी संतुलित राहून प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत हेच माझ्या समंजस पणाचे मोजमाप आहे .
७) निसर्गाने निर्माण केलेल्या जगात सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे व त्यांचा हा अधिकार हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही कारण मी सर्वश्रेष्ठ नाही हे मी कधीच विसरता कामा नये .
८) निर्मात्याने रचलेल्या या सुंदर जगात मी घाण करण्यासाठी नाही तर हे जग अधिक सुंदर करण्यासाठी जन्माला आलोय त्यामुळे जेथे जेथे शक्य होईल तेथे मी लोकांना मदत करण्याचा , आनंद देण्याचा व माझ्या परीने हे जग अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करीन . 
९) दया , क्षमा , शांती , स्नेह , करुणा , शील , ज्ञान , सद्सदविवेक हे अलंकार मानवी व्यक्तिमत्व अधिक सुंदर बनवतात हे सदैव ध्यानात ठेवेन .
१०) मृत्यू अटळ आहे हे न विसरता माझ्याकडे असलेल्या प्रत्येक क्षणाचा मी जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करेन हे माझ्या हाती आहे . विवेकनिष्ठ भावोपचार हा स्वतःवर स्वतःने करण्याचा उपचार आहे हे लक्षात ठेवत मी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याएवजी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे अधिक संयुक्तिक असते . 

बाकी पुढील भागात ............!

===========================================================================

दृष्टीकोन बदलण्याचे आव्हान -

कोणतीही व्यक्ती , घटना , परिस्थिती चांगली अथवा वाईट नसते तर आपला दृष्टीकोन त्याला तसे स्वरूप देतो हे जर नीट लक्षात घेतले गेले तर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भावनिक संतुलन टिकवून ठेवणे शक्य होते इतकेच नव्हे तर दैनंदिन जीवनात दृष्टीकोन बदलामुळे अनेक कठीण प्रसंगातून योग्य मार्ग काढता येऊ शकतो . अर्थात दृष्टीकोन बदलणे ही एक मोठी कसरत आहे कारण लहानपणापासून बनत गेलेले आपले दृष्टीकोन अंतर्मनात इतके खोल रुजलेले असतात की ते सहजासहजी बदलणे कठीण जाते , त्या साठी दृष्टीकोन बनतात कसे ते आधी पहावे लागेल .
१) संस्कार - जन्माला आलेल्या बाळाच्या मनाची पाटी अगदी कोरी असते पण नंतर त्याला एक माणूस बनवण्यासाठी पालक , गुरुजन व आसपास च्या संबंधित लोकांकडून जाणता - अजाणता वेगवेगळे संस्कार दिले जातात ज्याला आपण ' बाळकडू ' असेही संबोधतो यात धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक , नैतिक गोष्टींचाही समावेश असतो. अर्थात हे सारे संस्कार अगदी योग्यच असतात असे नाही कारण आजच्या विज्ञाननिष्ठ युगात अनेक धार्मिक संस्कार हे अंधश्रद्धा म्हणून ओळखले जातात तर काही संस्कार परिस्थिती नुसार कालबाह्य झालेत ..  काही संस्कार आसपासच्या वातावरणातून मनावर नकळत होत जातात..यात मित्र मैत्रिणींची संगत.. शाळा कॉलेजमधील वातावरण ..  घरातील तसेच आसपास च्या व्यक्तींचे वागणे, बोलणे देखील नकळत विशिष्ट संस्कार देण्याचे काम करतात व त्यातूनच एखाद्या व्यक्तीचा एकंदरीत जीवनविषयक दृष्टीकोन बनत जातो. अगदी घरात जे दैनिक वर्तमानपत्र नियमित वाचले जाते ते देखील एक विशिष्ट विचारसरणीचे असल्यास तो संस्कार नकळत मनावर बिंबवला जातो ..या पैकी अनेक संस्कार हे निरोगी मानसिकता बनविण्यास मदत करतात तर काही संस्कार अगदी विपरीत असतात जे आसपासच्या व्यक्ती व घटनांकडे बघण्याचा अविवेकी दृष्टीकोन तयार करत असतात . विवेकाचा वापर करून वेळोवेळी आपला दृष्टीकोन निकोप व मानवतेवर आधारित कसा ठेवता येईल हे पाहणे गरजेचे आहे कारण आपण पूर्वीच पहिले आहे जगात जसा मला सुखाने समाधानाने जगण्याचा अधिकार आहे असे मला वाटते तसाच अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि प्रत्येक वेळी मी माझ्या मर्जीने जगताना इतरांच्या हितास बाधा तर पोचवत नाहीय ना याचा विचार झाला पाहिजे .

==========================================================================


मी व माझ्या इच्छा ! 


१) माझ्या आयुष्यात सर्व काही नेहमी माझ्या इच्छे प्रमाणे घडावे असा माझा आग्रह असतो .
२) सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी माझ्या इच्छांचा पाठपुरावा करीत राहतो व रात्री झोपतानाही उद्याच्या इच्छा कशा पूर्ण होतील ही चिंता व आज पूर्ण न झालेल्या इच्छांबाबत खेद व्यक्त करीत , कोणाला तरी दुषणे देत मी झोपी जातो.
३)माझ्या इच्छांच्या आड येणारे लोक मला अजिबात आवडत नाहीत मग ते कोणीही असोत मी त्यांच्यावर मनोमनी चरफडत राहतो तर अनेकदा ही माणसे माझ्या जीवनातून नाहीशी व्हावीत असे मला वाटते .
४) माझ्या इच्छा माझ्या भल्याच्या आहेत किवा नाहीत याची परवा न करता मी इच्छापूर्तीसाठी झटत राहतो .
५)अनेकदा माझ्या इच्छा माझे भावनिक संतुलन बिघडवण्यास कारणीभूत असतात मात्र मला हे मान्य करणे कठीण जाते .
६) माझ्या इच्छा आणि इतरांच्या इच्छा या मध्ये होणारा संघर्ष माझे आणि कुटुंबियांचे देखील मनस्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत असतो .
७) नैसर्गिक , कौटुंबिक , सामाजिक आणि नैतिक बंधनांच्या चौकटी मला जाचक वाटत कारण त्या चौकटी मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू देण्याच्या आड येतात .
८) माझ्या इच्छांच्या विरुद्ध परिस्थिती असेल तेव्हा मी बंडखोरी करतो व बहुधा ही बंडखोरी माझ्या साठी घातक ठरते हे माहिती असूनही मी या वेळी तसे घडणार नाही या विश्वासाने बंडखोरी करतो .
९)माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाही तेव्हा मी निराशा , वैफल्य , संताप , भीती..दुख: या भावनांनी ग्रासला जातो व कधी कधी हे जीवन नकोसे होते .
१०) माझ्या इच्छेप्रमाणे जगणे ह माझा जन्मसिद्ध हक्क आहे या थाटात जगणे मला आवडते मात्र मी त्या मुळे अनेकांच्या इच्छांचा अनादर करतो आहे व त्यांचे जगणे कठीण करतोय याची मला जाणीवही नसते .
हे कितपत योग्य आहे ? मी आनंदी ,सुखी , प्रसन्न व समाधानी कसा राहू शकेन ?

विवेकनिष्ठ भावोपचार - भावनांचा चक्रव्यूह


वर्तमानपत्र उघडले की बहुतेक बातम्या या भ्रष्टाचार , गुन्हेगारी , राजकीय कोलांट्या उडया , आंदोलने , अन्याय तर दोनचार बातम्या उदघाटन , सत्कार , खेळातील विजय ,पराभव याबाबत आणि मग सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा , चिंता व्यक्त करणारा अथवा कोणालातरी कानपिचक्या देणारा अग्रलेख असतो .दूरदर्शन वाहिनीच्या बातम्यात असलाच प्रकार व मध्ये मध्ये एखाद्या विषयावर ' बाल की खाल ' काढणारी निरर्थक चर्चा .... काथ्याकुट . निरनिरळ्या दूरदर्शन मालिकांमध्ये संघर्ष , सूड , विवाहबाह्य संबंध , सत्तास्पर्धा , कुटील डावपेच .रोजच्या व्यवहारात देखील मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना , जवळच्या व्यक्तींचे अगदी प्रेमाचे तर कधी कधी त्रासदायक वाटणारे अनाकलनीय वर्तन , संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे खास स्वभावविशेष आणि त्या नुसार होणारे त्यांचे वर्तन . या सर्वांबाबत मनात उमटणाऱ्या प्रतीक्रिया , स्वतच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी असणारा संघर्ष , आनंदाचे , चिंतेचे , दुखःचे , पराभवाचे , स्वप्नांचे क्षण . सर्व परिस्थितीशी जुळवून घेत जगणे , हसतमुख राहणे , आणि पुन्हा पुन्हा नव्या आव्हानासाठी तयार असणे हेच जीवन आहे .मात्र सर्वांनाच जीवनाशी आपला स्वर जुळवून घेणे जमत नाही आणि मग मनाची तगमग , चीडचीड , असुरक्षितता , अनामिक भीती , निराशा , वैफल्य , राग या प्रकारच्या भावना मनात वारंवार येतात . कोणाला माझी पर्वा नाही , माझी काही किंमत नाही , आपणच का जुळवून घ्यायचे , सर्वांसाठी मी मरमर करायची ..इतरांनी मजा मारायची ... माझे नशीबच फुटके , अशा जगण्याला काय अर्थ आहे ..मी पण जशास तसे वागले पाहिजे .. वैगरे स्वगत मनात सुरु होते .



स्वतच्या कल्पनेतील चारदोन सुखाचे क्षण जगण्यासाठी बंडखोरीचा निर्धार केला जातो ... तर कधी कधी 'स्व ' ला जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाते आणि त्यामुळे मूळ समस्या वाढते ..किवा सगळे सोडून कुठेतरी निघून जावे हा विचार मनात जोर धरतो ...काहीजण मग दिशाहीन वाटचाल करू लागतात, काही नेमकी चुकीची दिशा धरून चालत राहतात तर काही हेच ओझे कायमचे वागवण्याचा निर्धार जपत ओठ शिवून , हुंदके लपवतात .सर्व प्रकारच्या परिस्थितीत शांत राहून सुरळीत जीवन जगणे एकंदरीतच कठीण होत चालले आहे . भावनांच्या चक्रव्युहातून वाट काढणे सोपे नाही मात्र अशक्यही नाही .आवश्यक आहे ते आधी स्वतःच्या भावना ओळखणे ..त्या समजून घेणे .. त्यांचा आहे तसा स्वीकार करून मग त्यातील अविवेकी भावना बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ..हे नक्कीच मनशांती च्या दिशेने उचललेले विवेकी पाउल ठरेल ...



निसर्गाने मानवाला प्रदान केलेली कुशाग्र बुद्धी हे एक मोठे वरदान आहे माणसासाठी व त्या जोरावरच मानव इतकी प्रगती करत आहे परंतु बुद्धीच्या वापरा मागे भावनांची प्रेरणा असते मानव सोडून इतर प्राण्यांच्या आहार , निद्रा , भयं आणि मैथुन या चार नैसर्गिक प्रेरणा मानल्या जातात व प्राणी या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाहीत किंबहुना त्यांची बुद्धी तितकीच मर्यादित ठेवली आहे परंतु मानव हा प्राणी मात्र इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण या चार नैसर्गिक प्रेरणांच्या खेरीज काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या मूळ विचारांमुळे . खरे तर यांना अध्यात्माने विकार असे संबोधले आहे कारण बहुधा प्रत्येक मानव काम, क्रोध , लोभ , मद , मोह, मत्सर यांचा अतिरिक्त वापर करून स्वत:चे भावनिक सुख मिळण्याच्या अतिरेकी प्रयत्नात स्वतःचे आणि स्वतासोबत इतरांचे देखील जिवन अधिक कष्टप्रद करत जातात . आपल्याला आसपासचा प्रत्येक मानव आनंद , सुख , समाधान , शांती आणि पर्यायाने सार्थकता मिळवण्यासाठी झटताना दिसतो व आनंद , दुखः , शांती , आणि सार्थकतेच्या प्रत्येकाच्या कल्पना मात्र वेगवेगळ्या असतात असेही आढळते ....आणि या कल्पना जर अविवेकी असतील तर ? विवेक म्हणजे नक्की काय ? मानस शास्त्रानुसार विवेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून जात असताना देखील स्वतःला आणि स्वताशी संबधित इतर लोकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेणारा विचार असे म्हणता येईल .प्रत्येक व्यक्तीने ' जगा आणि जगु द्या ' हे प्रमुख तत्व लक्ष्यात ठेवून विचार करत गेले तर विवेक जागवणे कठीण नाही .... जन्मापासून ते मृत्यू पर्यंत प्रत्येक मानवापुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात शारीरिक .. मानसिक ,कौटुंबिक .. सामाजिक व अध्यात्मिक या सर्व बाजूनी या समस्या येत असतात . काही समस्या निसर्गनिर्मित असतात .. काही आसपासच्या एखाद्या मानवाने निर्माण केलेल्या असतात तर काही समस्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी निगडीत असतात . अश्यावेळी समस्यातून मार्ग काढताना अनेक प्रकारच्या भावनिक आंदोलनांचा सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो व सरते शेवटी स्वतःला कमीत कमी त्रास कसा होईल किवा आनंद कसा मिळेल असा मार्ग काढण्याकडे प्रत्येकाचा कल असतो अश्या वेळी विवेक पूर्ण विचार हा बहुधा अधिक समाधान कारक मार्ग काढण्यासाठी मदत करीत असतो . बहुधा सगळे जण आपले सुख ..आनंद ..समाधान ..शांती हे बाह्य जगातील घटना ..व्यक्ती परिस्थिती यावर अवलंबून आहेत असे समजतात ..खरे तर कोणतीही अविवेकी अथवा विवेकी भावना नी अंतर्मनातून निर्माण होत असते .. कदाचित ती भावना निर्माण होण्यामागे एखादी घटना ..व्यक्ती ..परिस्थिती निमित्तमात्र असू शकते .. परंतु आपल्या भावनिक असंतुलनासाठी आपण इतरांना जवाबदार धरणे सोडून स्वतच्या विचारात..भावनांत आवश्यक बदल करू शकलो तर नक्कीच आपला फायदा असतो .